आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवातही सन १९६४ मध्ये ताय चुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. –८ ही भात जातींची लागवडी द्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणाऱ्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले.
अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे, तसेच ते दर तीन वर्षांनी बदलने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणी पूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे.
त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणी पूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे.
तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत 24 तास वाळवावे. नंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारा युक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
भातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. ज्या ठिकाणी उदबत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी बियाणे ५० से. ग्रे. अंश तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर ते चांगले सुकवून पेरणीसाठी वापरावे.