गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशभरात मान्सून चांगला राहिल्याने कृषी उत्पादनात 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकात, चालू वर्षी गहू, तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात एकूण 27 कोटी 33 लाख 80 हजार इतकी विक्रमी उत्पादन राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अन्न-धान्याचं उत्पादन किती राहिल याबाबत माहिती, कृषी मंत्रालयाने आपल्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकात दिली आहे. त्यानुसार, जुलै 2016 ते जून 2017 महिन्यापर्यंत गव्हाचं 9 कोटी 74 लाख टन, तांदळाचं 10 कोटी 91 लाख टन आणि डाळींचं उत्पादन 2 कोटी 24 लाख उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
उत्पादनाची अंतिम आकडेवारी सादर करण्यापूर्वी कृषी विभाग सर्व हंगामाच्या उत्पादनाची आकडेवारी सादर करतं आणि त्या आकडेवारीनुसार यंदा रब्बी हंगामातील पिकांची कापणी सध्या जोरात सुरु असल्याचं यात म्हटलं आहे.
तिसऱ्या सुधारित अंदाजानुसार असाही अंदाज वर्तवला जात आहे कि, अन्न-धान्याचं एकूण उत्पादन 27 कोटी 33 लाख टन इतकं होण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वी 2013-14 मध्ये 26 कोटी 50 लाख टन विक्रमी उत्पादन झालं होतं तर गेल्या वर्षी देशात 25 कोटी 15 लाख टन उत्पादन झालं होतं.
सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे तसंच 2016 या वर्षात पर्जन्यमान चांगले राहिल्याने देशात पिकांचं विक्रमी कृषी उत्पादन होत असल्याचं कृषी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.